TransLiteral
जाईची फ़ुले एक दिवस, कण्हेर आठ दिवस, बिल्वपत्र तीस दिवस, कमल एक दिवस, पळस एक दिवस, आघाडा तीन दिवस, तुळस सहा दिवस, शमीपत्र सहा दिवस, शतावरी अकरा दिवस, केतकी चार दिवस, माका नऊ दिवस, दूर्वा आठ दिवस, मांदारपुष्प एक दिवस, नागचाफ़ा दोन दिवस, दर्भ तीस दिवस, अगस्त्यपुष्प तीन दिवस, तिलपुष्प एक दिवस, तगरपुष्प सहा दिवस, पळस सहा दिवस, कल्हारपुष्प अकरा दिवस, मोगरा चार दिवस, चाफ़ा नऊ दिवस, दवणा एक दिवस इतक्या कालपर्यंत शिळी होत नाहीत. ( पदार्थदर्शात यांचे मत आहे. )
यात काहींच्या बाबतीत मतभेद आहेत ते -
१ ) जाईची फ़ुले एक प्रहर, कण्हेरी फ़ुले अहोरात्र, तुळशी, बिल्वपर्ण आणि सारी कमळे यांना शिळेपणाचा दोष नाही. तसेच माळ्याच्या घरी असलेल्या फ़ुलांना दोष नाही. ( भार्गवार्चन भविष्य )
२ ) तुळशीपत्र आणि भागीरथीचे पाणी हे शिळे असले तरी वर्ज्य करू नये. ( बृहन्नारदीय )
३ ) तुळशीपत्र शिळे होत नाही. बिल्वपत्र तीन दिवस, कमळ पाच दिवस शिळे होत नाही. ( पद्मपुराण )
४ ) पळस पुष्प एक दिवस, कमळ तीन दिवस, बिल्वपत्र पाच दिवस तुळस दहा दिवस यानंतर शिळी होतात. ( स्कंदपुराण )
५ ) बिल्वपत्र, कुंदपुष्प, तमालपत्र, आवळीपत्र, कल्हार कमळ, तुळशी पत्र, कमळ, अगस्तपुष्प, कुश आणि पुष्पांच्या कळ्या एक दिवसापूर्वीच्या असल्या तरी शिळ्या होत नाहीत. ( तिथितत्त्व, मत्स्यपुराण )
६ ) सर्व कमळे, पत्रे, कुश, पुष्पे ही कुजली, सडली नसली तर ती शिळी होत नाहीत. जलाशयातील ताजी कमळाची कळी देवास वाहिली असता चालेल. पण इतर फ़ुलांच्या कळ्या देवास वाहू नयेत. ( स्मृतिसारावली )
७ ) दवणा - दवण्याची माळ भगवंताला अतिशय प्रिय व आनंद देणारी आहे. ती शुष्क झाली किंवा शिळी झाली तरी निषिद्ध नाही. ( टोडरानंद स्कंद )
टीप - निर्माल्याविषयी वरीलप्रमाणे निरनिराळ्या ग्रंथांत भेद सांगितले आहेत. परंतु प्रसोगोपात्त भेदनिर्णयाप्रमाणे पत्रे - पुष्पे उपयोगात आणावीत.
आधार - निर्णय सिंधू