Transliteral-Foundations
निमि विदेह हा अयोध्यापती इक्ष्वाकु राजाच्या शतपुत्रांपैकी बारावा होता. याने विदेश राजवंशाची स्थापना केली. यज्ञ करतांना वसिष्ठ ऋषींना डावलल्याने त्यांच्या शापाने याचे शरीर अचेतन होऊन याचा प्राण आणि आत्मा अनाथाप्रमाणे भटकू लागले. शरीर आणि आत्मा यांचा वियोग असह्य होऊन यज्ञसमाप्तीच्या वेळी हविर्द्रव्याच्या भक्षणार्थ उपस्थित झालेल्या देवता गणास हा शरण गेला, आणि विदेही अवस्थेत याच्या प्राणांना झालेल्या असह्य वेदना याने त्यांस कथन केल्या. विदेहत्वाचे दुःख एकदा भोगल्यावर पुन्हा सशरीर होण्याची वांच्छा यास राहिली नव्हती. म्हणूनच देवतांजवळ सशरीरत्वाचे वरदान न मागता सृष्टीतील हरेक मनुष्यमात्राच्या नेत्रांमध्ये प्रवेश करण्याचे वरदान याने मागितले. अशा तर्हेने मानवी शरीरात प्रवेश मिळूनहि सशरीरत्वाच्या दुःखापासून हा मुक्त झाला. देवतांच्या आशीर्वादाने याची स्थापना मानवी नेत्रांत झाल्याने त्यामध्ये उघडझापेची प्रक्रीया सुरू झाली. याच्या नावावरून त्या क्रियेस ‘ निमिष ’ नाव प्राप्त झाले. ( विष्णुधर्म. १. ११७ )