या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सात आसरा म्हणतात. यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तिथेही असते असे मानले जाते. लढाईतील वीराला जे मरण प्राप्त होते त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे. ही पिशाच्चे परद्वेष्टी असून त्यांना चंद्र देवतेप्रमाणे वागावयाचे असते, त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधिले जाते, असा समज आहे. दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता मानतात. या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात. तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात. दुर्गा भागवत यांच्या मते (लौकिक दंतकथा, नवभारत, नोव्हेंबर १९५९) या देवतांचे प्रतीक म्हणून सात दगड शेंदूरचर्चित करून त्यांची पूजा केली जाते. दक्षिण भारतात सात आसराना एक भाऊही असतो.
स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत. याच शब्दाचा ग्रामीण भाषातील अपभ्रंश म्हणणे आसरा होय. या नेहमी सातच्या समूहाने रहातात, अशा आख्यायिका असल्याने साती - आसरा हा शब्द रूढी परंपरेने प्रचलित झाला आहे.
विहिरी, तळी, पाणवठे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनी किंवा जलदेवता असेही म्हणतात.
महाराष्ट्र ज्ञानकोशकरांच्या मते आसरा हा शब्द अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. या देवता जलामध्ये राहतात ,म्हणून त्यांना जलदेवता असेही म्हटले जाते.
सात आसरांची जी नावे प्रचलित आहेत, ती जलचराच्या नावावरूनच आलेली दिसतात.
मत्स्यी - माश्याचे रूप असलेली
कूर्मी -कासवाचे रूप असलेली
कर्कटी -खेकड्याचे रूप असलेली
दर्दुरी -बेडकाचे रूप असलेली
जतुपी -
सोमपा -
मकरी - मगरीचे रूप असलेली
ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात.
ऋग्वेदाच्या उत्तर काळात भूलोक व विशेषत: त्यावरील वृक्ष हे देखील यांच्या संचारक्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. औदुंबर व पळस वृक्षावर यांचा निवास असतो, असेही मानले जाते.
या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात. यांचे सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदू मनाची माणसे. त्या लहान मुलांनाही पछडतात. त्यामुळे अवसे-पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्हीसांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये. यांचे स्वरूप विचित्र असते. त्या कधी कुत्री, मांजर यांच्या स्वरूपातही असतात. काही ठिकाणी गाय अथवा म्हैस व्याली म्हणजे पहिल्या तीन दिवसांचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते नाहीतर दुभते जनावर आटून जाईल असा समज आहे. या आसरानी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठरावीक दिवशी त्या जागी ठेवले जाते.
ग्रामीण भागातील मुली लग्नानंतर माहेरी आल्यास, अगत्य करून यांची पूजा अर्चा करून, हळदी कुंकू लावून नारळ फोडून पूजा करतात. या मागील पौराणिक हेतु असा, की या मुली माहेरी असतांना अनेक वेळा बारव, नदी, नाले, विहिरी अशा ठिकाणी फिरलेल्या असतात. यांचे रक्षण या असरांनी केलेले असते, असा समज आहे.
References :
आसरा
संकेत कोश - संख्या ७
Source : Eknath Wagh